Salman Khan House Firing : मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त; सलमान खान गोळीबार प्रकरणी संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Salman Khan House Firing : मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त; सलमान खान गोळीबार प्रकरणी संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Salman Khan House Firing : सिनेअभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचे आता राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह महायुती सरकारवर (Mahayuti Government) निशाणा साधला आहे. मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली असून, सरकार महायुतीच्या चिल्लर नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, "सलमान खान हे सिने जगतातलं मोठं नाव आहे, त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारात आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई आणि महाराष्ट्राच संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून मिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय त्याला सुरक्षा पुरवली जातेय. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्याला प्रचंड पोलीस संरक्षण, अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर असल्याचे,” संजय राऊत म्हणाले. 

गृहमंत्री राजकारणात अडकलेत 

सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकलेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं असल्याचे राऊत म्हणाले. 

पोलीस आयुक्तांचे मुंबईवर लक्ष आहे की नाही?

पोलीस आयुक्त काय करत आहेत, पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना, त्यांचा मुंबईवर लक्ष आहे की नाही, की ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाण सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले. 

मनात भीती असल्याने जाहीरनामा घोषित करण्यासाठी आजचा दिवस निवडला

ज्यांनी दहा वर्षात रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुडदा पाडला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग असल्याचे संजय राऊत म्हणाले. तुम्ही आजचा दिवस निवडला असेल, तर ती त्यांच्या मनातली भीती आहे. देशातील जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागृत झाल्याने भाजपने जाहीरनामा घोषित करण्यासाठी आजचा दिवस निवडला असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

उद्धव ठाकरेंची शिवसेना छाताडावर बसल्याने असे वक्तव्य...

फुसका बार ज्याला तुम्ही म्हणताय हेच तुम्हाला काल खांद्यावर घेऊन फिरवत होते, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले. तसेच, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे भाजपच्या मनातील आणि पोटातील भीती आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रयत्न करूनही संपली जात नाही, संपवली जात नाही आणि आमच्या छाताडावर बसलेली आहे या भीतीतून अशी वक्तव्य केली जात असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने