Nagpur Crime News : प्रेमप्रकरणात मित्रानेच केला मित्राचा घात; निर्जनस्थळी नेत चाकूने केले 25 हून अधिक वार

Nagpur Crime News : प्रेमप्रकरणात मित्रानेच केला मित्राचा घात; निर्जनस्थळी नेत चाकूने केले 25 हून अधिक वार

Nagpur Crime नागपूर : प्रेम प्रकरणातील (Love Affair) किरकोळ वादातून एका मित्राने आपल्याच मित्राला निर्जनस्थळी नेत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur Crime) वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना (Nagpur Police) मिळातच त्यानी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली असता यातील तीन मारेकऱ्यांना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे.

रवी सावा (26, रा. इंदोरा) असे मृतकाचे नाव आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आवेश मिर्झा बेग, कुणाल खडतकर आणि आयुष पेठे असे या तीन संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता प्रेमप्रकरणातून ही हत्येची घटना घडल्याचे यातील मारेकऱ्यांनी कबूल केले आहे.      

प्रेमप्रकरणात मित्रानेच केला मित्राचा घात

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सातत्याने झलेल्या हत्या आणि गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरले होते. त्यामुळे नागपूरातील आणि त्यातल्या त्यात राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशातच आता आणखी एक हत्येच्या घटनेने शहर हादरले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, पांढुर्णा येथील पोलीस पाटील यांना एक तरुण गावातील परिसरात पडून असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असता त्यांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे आढळून आले. त्यानंतर तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली.

निर्जनस्थळी नेत केले चाकूने 25 हून अधिक वार  

दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता मृत रवीकडे त्याचा मोबाइल फोन आढळून आल्याने त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. सोबतच या हत्येच्या घटणेपूर्वी करण्यात आलेल्या कॉल लिस्ट मध्ये काही नावे आढळून आल्याने पोलिसांनी तपास त्या दिशेने वळवला असता या घटनेतील सत्य समोर आले. प्राप्त माहिती नुसार, मृतक रवीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

मात्र, याच तरुणीची गेल्या काही दिवसांपासून यातील संशयित आरोपी आणि  मृत रवीचा मित्र असलेल्या आवेशशी देखील ओळख झाल्याने त्यांच्यात  जवळीक निर्माण झाली होती. परिणामी या प्रेम प्रकरणातून त्याच्यात कायम वाद होत होता. अशातच त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्याने आवेशने रवीला भेटायला बोलावले आणि निर्जन स्थळी नेत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी आवेशने आपल्या दोन इतर साथीदारांच्या मदतीने रविवर 25 हून अधिक वार करत त्याची हत्या केली. 

अवघ्या काही तासात तीनही मारेकऱ्यांना अटक 

या घटनेत रविचा जागीच मृत्यू झाल्याने आवेस आणि त्याच्या इतर दोन साथीदाराने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या घटनेचा तपास करतांना पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणातील तीनही संशयित आरोपींना अटक करत हत्येच्या गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने